Pages




Thursday 4 July 2013

थोर समाजसेवक - आचार्य विनोबा भावे


                           


आपल्या आचारांतून, विचारांतून माणुसकीची, त्यागाची शिकवण देणारे आचार्य विनोबा भावे हे एक थोर मानवतावादी पुरुष होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, हा विनोबांचा गुणविशेष होता.
आयुष्यभर ब्रम्हचारी राहून लोकांची सेवा करण्याचे व्रत त्यांनी लहान वयातच स्विकारले होते. आयुष्यभर लोकांना माणुसकीची, त्यागाची शिकवण देणारे आणि स्वत: ते तत्व पाळणारे विनोबा त्यागाचे प्रतिक होते.
    विनोबांचा जन्म रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी इ. स. १८९५ मध्ये झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते गांधीजींचे शिष्य बनले. जन्मभर ब्रम्हचारी राहून गरीब जनतेची सेवा करायची, स्वत:साठी जगायचे नाही, तर आपले उभे आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी खर्च करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले होते.
    त्यांनी सर्वसंगपरित्याग केला होता. गुडघ्यापर्यंत धोतरवजा पंचा आणि खांद्यावर छोटा पंचा हा त्यांचा वेश होता. अगदी साधे आणि थोडे जेवण असा त्यांचा आहार होता. आश्रम हेच त्यांचे घर होते.
    स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन त्यांनी तुरुंगवासही भोगला. तुरुंगात असताना त्यांनी आपल्या प्रवचनातून मानवतेची शिकवण दिली. ते चरख्यावर सूत कातायचे. माणसा माणसामध्ये भेदभाव करु नक. आपण सारे एकाच परमेश्वराची लेकरे आहोत असे ते सांगत असत. समाधानी वृत्ती माणसाला दु:खापासून दूर ठेवते. गरज नसताना साठा केला तर गरजू लोकांवर अन्याय होतेा.आपण इतरांचाही विचार केला पाहिजे.दुसऱ्याला देण्यातच खरा आनंद असतो. अशी शिकवण ते देत असत.
    गांधीजींच्या प्रेरणेने विनोबांनी वर्धा येथे पवनार आश्रम सुरु केला. आपल्या देशातील लोकांची हलाखीची स्थिती विनोबांनी पाहिली. लोकांना खायला पोटभर अन्न मिळत नव्हते. हाताला काम नव्हते. म्हणून विनोबांनी मोठ्या जमीनदारांना विनंती केली आपल्याकडची थोडी जमीन दान करा. असा प्रचार ते करु लागले. विनोबांच्या विनंतीवरुन अनेक मोठ्या श्रीमंत जमीनदारांनी विनोबांना जमीन दिली. विनोबा ही जमीन त्याच गावातील गरीब, भूमिहीन मजूरांना वाटून टाकायचे. गरीब लोक त्या जमिनीत कष्ट करुन पोट भरु लागले.
    अशा रीतीने विनोबांनी भूदान यात्रा सुरु केली. अनेक गावात ते जात. जमीनदारांकडून मिळालेली जमीन भूमिहिनांना वाटून ते पुढे जायचे. कष्टकरी, गरीब लोकांना अशा रीतीने विनोबा जमीन मिळवून देऊ लागले. पदयात्रा करीत ते गावागावात फिरत होते. आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार ठिकाणी फिरुन विनोबांनी हजारो लोकांना मिळालेल्या जमिनीचे वाटप केले. गरीबांच्या कल्याणासाठी त्यांनी सर्वांचा उद्धार करणारी सर्वोदय योजना सुरु केली.
    सर्वोदय योजनेव्दारे गरीबांना प्रगतीचा, प्रकाशाचा, सत्याचा, मार्ग दाखवून त्यांचे कल्याण साधणारे विनोबा चंबळच्या खोऱ्यात आले. तेथील भयंकर दरोडेखोरांनी हजारो लोकांचे जीवन धोक्यात आणले होते. अशा दरोडेखोरांचे प्रबोधनाव्दारे मतपरीवर्तन करुन विनोबांनी त्यांना माणसात आणले.
    स्वच्छतेचे महत्व विनोबांना माहित होते. ते स्वत:ही शौचकूपे साफ करायचे काम करायचे. स्वच्छता हाचे परमेश्वर असे ते सांगायचे. सर्वांचा उद्धार ही शिकवण देणारे आचार्य विनोबा भावे यांनी मानवतेची शिकवण देत १९८२ मध्ये देहत्याग केला.

थोर समाजसेवक - कर्मवीर भाऊराव पाटील

                                         

थोर पुरुषांनी बहुजन समाजाला दारिद्र्याच्या, निरक्षरतेच्या, अज्ञानाच्या खाईतून वर काढण्यासाठी आपले आयुष्य झिजवले, पणाला लावले अशा थोर पुरुषांत, समाजसेवकांत कर्मवीर भाऊराव पाटील यांची गणना होते. लोक त्यांना प्रेमाने कर्मवीर अण्णा असे म्हणायचे.
    कर्मवीर अण्णांचा जन्म २३ जून १८८६ रोजी महाराष्ट्रातील कुंभोज या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील , तर आईचे नाव गंगाबाई.
    प्राथमिक आणि थोडे इंग्रजी शिक्षण घेऊन अण्णांनी शरीरसंपदा कमावली, महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचा आणि राजर्षी शाहू महाराजांच्या समाजसुधारणेच्या कार्याचा मोठा प्रभाव अण्णांवर पडला. त्यांचे विचार क्रांतीकारी बनले. आपला समाज सामाजिक भेदभावांनी, अन्यायी रुढी परंपरांनी, निरक्षरतेने, अज्ञानाने, दारिद्र्याने पिडलेला त्यांनी पाहिला. अशा बहुजन समाजाला शिकवून त्यांचे अज्ञान, दारिद्र्य दूर करण्याचा, दलित बांधवांना समानतेची, माणूसकीची वागणूक देण्यासाठी आयुष्यभर कष्ट करण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगले.
    एका दलित बांधवाच्या मुलाला घेऊन त्यांनी वसतिगृहाचीस्थापना केली. शाळा आणि वसतिगृहे उभारुन गरीबांच्या दारात शिक्षणाची गंगगा नेऊन पोचविली. रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन शेकडो शाळा, तंत्रशाळा, शेतीशाळा, महाविद्यालयांची स्थापना केली. वटवृक्ष जसा फोफावतो, तसे शिक्षण संस्थांचे जाळे विणून अज्ञानी समाजाला शिकवून त्यांचे अज्ञान आणि दारिद्र्य दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
    दलित बांधवांना माणूसकिचे हक्क आणि सामाजिक समता मिळवून देण्यासाठीही त्यांनी खूप कष्ट घेतले.
    देश पारतंत्र्यात असलेला पाहून त्यांनी खादीचा स्विकार करुन स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. मजूर, शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवून त्यांना मानाने जगण्याची संधी मिळवून देण्यासाठीही देह कष्टविला. सत्यशोधक चळवळीचा प्रसार करुन अडाणी, रूढीग्रस्त समाजाला जाग आणण्याचे कार्य त्यांनी केले. कमवा आणि शिका योजना राबवुन विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे महत्व पटवून देऊन आयुष्यभर शिक्षणप्रसार, सामाजिक समता, मजूरांचे व शेतमजूरांचे हित साधले. समाज सुधारणा करणारे कर्मवीर अण्णा तन मनाने झिजून १९५९ साली अनंतात विलिन झाले.

थोर समाजसेवक - छत्रपती शाहू महाराज


                                 

सामाजिक बंधुभाव, समता, दलित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला व क्रिडा, आरोग्य आदी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ज्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, ते थोर महापुरुष म्हणजे छत्रपती शाहू महाराज.
    पारतंत्र्य, दुष्ट रूढी परंपरा, निरक्षरता, अज्ञान इत्यादी समस्यांनी ग्रासलेल्या काळात इ.स. १८७४ मध्ये शाहू महाराजांचा जन्म झाला.
    बहुजन हिताय बहुजन सुखाय हे सूत्र ध्यानात घूऊन शाहू महाराज राज्यकारभार पाहू लागले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याची फळे सर्व समाजाला चाखता यावीत म्हणून त्यांनी आपले सिंहासनच पणाला लावले. अज्ञान अंधश्रद्धा, निरक्षरता सामाजिक दुजाभाव, दारिद्रृय यात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी महाराजांनी आपला खजिना सताड उघडला.
    बहुजन समाजाची धार्मिक, सामाजिक गुलामगिरी आणि त्यांचे दारिद्र्य यावर एकच उपाय, ते म्हणजे बहुजन समाजाचे शिक्षण. बहुजन समाजाला शिक्षण देऊन शहाणे करायचे, आणि आपली सत्तासंपत्ती, त्यांच्या कल्याणासाठी वापरायची हा क्रांतीकारी निर्णय त्यांनी घेतला. सर्व विद्याथ्यांसाठी वसतिगृहे आणि शाळांची उभारणी केली. गरीब विद्यार्थ्यांसाठी आपला राजवाडाच त्यांनी खुला केला. त्यांच्या अशा कार्यामुळे गरीब, दलित आदी सर्व बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाचे दरवाजे कायमचे सताड उघडे केले.
    दलित बांधवांना सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांना ज्ञानी करुन त्यांचे अज्ञान दूर करण्यासाठी महाराजांनी खास शाळांची, वसतिगृहांची स्थापना केली. दुष्ट रूढी परंपरांवर प्रहार करुन दलित बांधवांना माणूसकिचे मिळवून देण्यासाठी मोठा लढा दिला.
    क्रूर रूढी आणि प्रथांना पायबंद, हुंड्यांची भयानक रुढी, दारुचे दुष्परीणाम, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक ऐक्य, स्वदेशीचा आग्रह व प्रचार, बालविवाहाचे दुष्परीणाम असे लोककल्याणकारी विषय घेऊन समाज घडविण्यासाठी महाराजांनी अथक परिश्रम घेतले. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली नाही.
    दुष्काळावर मात करण्यासाठी त्या काळी रोजगार हमी योजना सुरु केली आणि त्या योजनेतून रस्ते, तलाव, पूल बांधून
घेतले. मजूरांच्या लहान मुलांसाठी शिशु संगोपन गृहे उघडली. अपंग, अनाथ, आजारी वृद्धांसाठी अनेक ठिकाणी निराधार आश्रम सुरु केले. प्लेग या भयानक रोगापासून स्वसंरंक्षण कसे करावे त्यावर काय उपाय करावे याची माहितीपत्रके छापून लोकांचे अज्ञान दूर केले.
    सामान्य गरीब जनता माणूसकीला पारखे झालेले दलित बांधव यांना जागृत करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे रहण्यास अथक प्रयत्न करुन महाराजांनी त्यांना प्रगतीप्रथावर नेले. अधर्मावर, दुष्ट आणि क्रूर रुढी परंपरांवर कठोर प्रहार करुन मानव धर्माचा, माणूसकीचा, सामाजिक समतेचा, लोककल्याणाचा वृक्ष त्यांनी बहरत ठेवला. राजा असूनही ते लोकांसाठी, समाजासाठी राजऋषीसारखे जगले. समाजाला न्यायाचा, प्रगतीचा प्रकाश देणारे मार्ग दाखविणारे शाहू महाराजांचे १९२२ साली निधन झाले.

थोर समाजसेवक - बाबा आमटे

                          


दीपस्तंभ बनुन दु:खी लोकांच्या जीवनात आनंदाचा, सौख्याचा प्रकाश निर्माण करणारे बाबा आमटे हे एक महान समाजसेवक होते. स्वत: अपंगत्वाचे दु:ख भोगत असतानाही त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाचे दु:ख आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी खर्च केले.
    अशा थोर बाबांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे २६ डिसेंबर १९१४ रोजी झाला. बाबांचे सर्व शिक्षण नागपूर येथे झाल्यावर समाजातील उपेक्षित लोकांसाठी, असंघटील लोकांसाठी काम करायला त्यांनी सुरुवात केली. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन त्यांनी तुरुंगवासही भोगला. दलित बांधवांच्या वस्तीत शिरुन ते त्यांना त्यांच्या हक्काची जाणिव करुन देऊ लागले. लोकसेवेचे काम करता करता ते साफ सफाईचे, शौचालय साफ करण्याचेही काम करु लागले. आणि याच वेळेला कान नाक झडून गेलेला, जखमांनी विव्हळणारा, गटाराच्या कडेला पडलेला एक महारोगी त्यांच्या दृष्टीस पडला. तो असहाय्य जीव पाहून बाबांचे मन गलबलले, त्यांच्या मनातील करुणा जागी झाली. महारोग्यांच्या सेवेसाठी आयुष्य पणाला लावण्याचे त्यांनी पक्के ठरवून जनसेवेचे व्रत स्विकारले.
    वरोडा, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, हेमलकसा येथे त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी श्रमदानाने आश्रम उभारले. उपेक्षेचे, अपमानाचे चटके सोसत समाजाने दूर लोटलेले असंख्य कुष्ठरोगी बाबांच्या आश्रमात आश्रयाला आले. कुष्ठरोग्यांची शुश्रूषा करुन ते त्यांची सेवा करु लागले.
कुष्ठरोग्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. डोंगराळ, जंगली जमीन त्यांनी साफ केली.पाण्यासाठी श्रमदानाने विहिरी खोदल्या. निवाऱ्यासाठी पक्क्या झोपड्या उभ्या केल्या.बाबांनी माळरानावर शेती उभी केली. औषधोपचाराने, मायेने बरे वाटू लागलेले कुष्ठरोगी या शेतात बाबांना मदत करु लागले. हळूहळू बाबांनी त्यांना सुतारकाम, लोहरकाम, पत्र्यापासून डबे, संसारोपयोगी वस्तू बनविणे, चटया विणणे, भाजीपाला, फळे विक्रीस पाठविणे असे विविध व्यवसाय शिकवून बाबांनी त्यांना आत्मनिर्भर बनविले. रोगमुक्त झालेल्या कुष्ठरोग्यांच्या वसाहती बाबांनी स्थापन्न केल्या. बाबांनी या वसाहतीला नाव दिले आनंदवन.
    कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी दवाखाने सुरू करुन बाबांनी त्यांच्या औषधोपचाराची व्यवस्था केली. त्यांना आरोग्याचे स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.
    बाबांनी समाजसेवेचे वेगळे, अनोखे प्रयोग करुन त्यांत यश मिळविले. त्यांनी कुष्ठपिडीतांच्या आणि इतरही मुलामुलींसाठी शाळा आणि महाविद्यालये उघडली. अनाथ मुले, अपंग, वृद्ध यांच्या सेवेसाठी अनाथाश्रम, वृद्धाश्रम उघडले. जंगलातील जखमी अपंग प्राणी आणि पक्ष्यांसाठी औषधोपचाराची, पालनपोषणाची व्यवस्था केली.
देशाची एकता आणि अखंडता धोक्यात आल्याचे पाहून बाबांनी भारत जोडो अभियान सुरु केले. बाबा स्वत: कमालीचे अपंग असून सुद्धा भारतभर पदयात्रा काढून त्यांनी सर्वांना भारताच्या एकतेचे, अखंडत्वाचे रक्षण करण्याची शिकवण दिली.
मानवतेची सेवा करता करताच हे महान योगी अनंतात विलिन झाले.

थोर समाजसेवक - अहिल्याबाई होळकर

                        

इंदूर संस्थानच्या अधिपती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चौफेर कर्तबगारीने, चोख राज्यकारभाराने, कल्याणकारी समाजसेवेने त्यांचे नाव अजरामर झाले.
    अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मदतीला जवळचे कुणीही नसतानाही सुमारे ३० वर्षे राज्यकारभार सांभाळून त्यांनी सामान्य जनतेचे हित साधले व त्यांचे दु:,ख दारिद्र्य दूर करण्याचे कार्य केले.त्यांच्या लोकसेवेच्या जनहिताच्या कार्याने सामान्य जनता इतकी भारावली की, ती त्यांना देवतेप्रमाणे मानून पुण्यश्लोक अहिल्याबाई असे म्हणू लागली.
    अपार संकटे, अपार दु:ख त्यांच्या वाट्याला आले तरी अहिल्याबाई आपल्या जनहिताच्या, समाजसेवेच्या कार्यापासून कधी मागे हटल्या नाही. संस्थानिक म्हणून राज्य करताना ऐशआरामात न राहता त्या अगदी साधेपणाने, सात्विक वृत्तीने, आपले दु:ख विसरुन आयुष्याच्या अंतापर्यंत जनहिताचे कार्य करीत राहिल्या.
    अहिल्याबाईंचा जन्‍म्‍ा इ.स. १७२५ च्या सुमारास बीड जिल्ह्यात झाला. घरातील सात्विक वातावरणामुळे त्या घरच्या घरीच लिहायला वाचायला शिकल्या. त्या ज्ञानसंपन्न, सदाचारी आणि जनतेची दु:खे दूर करणाऱ्या साध्वी स्त्री होत्या.
    त्यांनी राज्याचा खजिना लोक कल्याणकारी योजना आणि समाजाच्या हितासाठी, समाजाचा विकास घडवून आणण्यासाठी खर्च करायला सुरुवात केली. त्या तहानलेल्यांची तहान आणि भुकेलेल्यांची भूक भागवू लागल्या. निराधार, वृद्ध, अपंगांसाठी, त्यांना राहण्यासाठी धर्मशाळा बांधल्या. सर्वांनर पाणी मिळावे म्हणून ठिकठिकाणी विहिरी खोदल्या. पाणपोयांची सोय केली. भुकेल्या लोकांना मोफत भोजन मिळावे म्हणून अन्नछत्रे उघडली. राज्याचे धन म्हणून म्हणजे जनतेची, लोकांची ठेव. हा पैसा समाजासाठी, गरजू लोकांसाठीच खर्च झाला पाहिजे असे अहिल्याबाई मानत असत. लोकांचा पैसा लोकांच्या कल्याणासाठी, त्यांचे दु:ख दारिद्र्य दूर करण्यासाठीच त्या वापरु लागल्या.
    सर्व लोक समान आहेत कोणी मोठा नाही, कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही असे विचार मांडून त्यांनी सर्वांना समानतेने वागविले. गरीब, असहाय लोकांवर झालेला अन्याय त्यांनी कधी खपवून घेतला नाही. सामान्य लोकांवर अत्याचार, जुलूम, जबरदस्ती त्यांनी कधी होऊ दिला नाही.
    लोकांच्या सुख सुविधांकडे त्यांचे सतत लक्ष असायचे. अन्न धान्‍य किंवा पाण्याची टंचाई त्या कधी जाणवू देत नसत. गरीब आणि असहाय्य लोकांना त्या नेहमी आर्थिक मदत करायच्या. काळानुरूप त्यांनी लोकहिताचे कायदे केले. जाचक कायदे रद्द केले. त्यांच्या राज्यात स्त्रियांना अधिकार आणि मानाचे स्थान होते. त्या नेहती कायद्यानुसारच राज्यकारभार करायच्या. धार्मिकतेच्या आहारी जाऊन त्यांनी कधी लोकांचा पैसा उणळला नाही. राज्याचा पैसा त्यांनी काटेकोरपणे सामान्य जनतेच्या हितसाठीच वापरला. त्या अनाथांच्या पालनकर्त्या होत्या. दयाळूपणा, समाजहिताचा कळवळा, जनतेचे दु:ख निवारण, प्रेम, औदार्य म्हणजे अहिल्याबाई, असे जनता मानत होती.
    सामान्य जनतेच्या तारणहार पुण्यश्लोक अहिल्याबाई इ. स. १७९५ च्या सुमारास स्वर्गवासी झाल्या.

थोर समाजसेवक - मदर तेरेसा


                        

अनाथ, अपंग , निराधार , वृद्ध, आजारी, कुष्ठपिडीत लोकांची मातेच्या ममतेने सेवा शुश्रूषा करणाऱ्या मदर तेरेसा यांना जग विश्वमाता म्हणूनच ओळखते.
    मदर तेरेसा यांचा जन्म युरोप खंडातील युगोस्लाव्हीया देशात इ.स. १९१० च्या सुमारास झाला. लहानपणापासून त्यांचा कल दुसऱ्यांचे दु:ख निवारण्याकडे होता. अनाथांची सेवा हीच प्रभूसेवा असेच त्यांचे विचार होते. संसार प्रपंचापासून त्यांचे मन निरिच्छ बनले. आयुष्यभर अनाथांची सेवा करीत राहणे हेच त्यांनी आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय ठरविले.
    भारतातील कोलकाता येथे जाऊन तेथेच आयुष्यभर अनाथांच्या सेवेला वाहून घेण्याचे तयांनी ठरवले. येथे आल्यावर त्या आपला देश विसरल्या, भारत हीच माझी कर्मभूमी, भारत हाच माझा देश, असे मानून त्या पक्क्या भारतीय बनल्या.
    त्यांनी ऐषारामी राहणे सोडून दिले. खादीची जाडी भरडी पांढरी साडी तसेच पोलके त्यांनी कायमचेच परीधान केले. डाळ भात हाच त्यांचा कायमचा आहार झाला. सेवा सुश्रूषा करण्याचे, मुलांना शाळेत शिकविण्याचे आवश्यक ते शिक्षण त्यांनी घेतले. बंगाली व हिंदी भाषा त्या शिकल्या. सुरुवातीला काही काळ शाळेत शिकवून त्यांनी स्वत:च झोपडपट्टीतील गरीब मुलांमुलींसाठी शाळा उघडली. चार विद्यार्थी घेऊन सुरु केलेल्या या शाळेत नंतर शेकडो अनाथ, गरीब मुले शिक्षण घेऊ लागली.या कामी त्यांना लोकांचीही मदत झाली.
    त्यांचे मन दया, करुणा ममतेने काठाकाठ भरलेले होते. टाकून दिलेल्या अनाथ लहान मुलांसाठी त्यांनी शिशुसदन उघडले. कृश, कुपोषित, आजारी शिशूंची त्यांनी मातेच्या ममतेने सेवा करुन आणि त्यांचे पालन पोषण करुन त्यांच्या त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे केले.
    वृद्ध निराधार, अपंग लोकांसाठी वृद्धाश्रम उभा करुन त्‍या सर्वांची सर्व प्रकारची देखभाल त्यांनी केली. कुष्ठपिडीत लोकांवर उपचार करुन त्यांना निवारा व्यवसाय उभारुन दिला. पूर, भूकंप किंवा प्रचंड संकटांनी ग्रस्त झालेल्या भारतातील व परदेशातील लाखो लांकांना मदतीचा हात दिला. गरीब वस्तीत मोफत औषधोपचाराच्या सोई त्यांनी उपलब्ध करुन दिल्या. अशा प्रकारे आयुष्यभर त्या जनतेचे दु:ख निवरणाचे मानवतेचे कार्य करीत राहील्या. त्यांचे महान कार्य पाहून भारताने भारतरत्न आणि जगानेही नोबेल पारितोषिकाने त्यांना गौरव करुन सन्मानित केले. शेवटच्या क्षणपर्यंत मानवतेची सेवा करुन त्य ख्रिस्तवासी झाल्या.

थोर समाजसेवक - सावित्रीबाई फुले


                                                                  
एकोणिसाव्या शतकात पुण्याजवळील एका खेड्यात, एका गरीब कुटुंबात सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्या काळी बहुजन समाज जवळजवळ अडाणी , निरक्षर, दरिद्री, अंधश्रद्धा दुष्ट सामाजिक रुढी परंपरांनी ग्रासलेला होता.
    स्त्रियांना शिक्षण घेता येत नव्हते आणि आताच्या सारख्या त्या काळी मुलींसाठीच नव्हे तर मुलांसाठीही शाळा नव्हत्या. घरी थोडे फार शिक्षण होई तेवढेच.  मुलींची, स्त्रियांची अवस्था तर फारच बिकट होती. चूल आणि मूल एकढेच त्यांचे क्षेत्र मर्यादित होते.
    सावित्रीबाईंचा विवाह लहान वयातच जोतिबा फुले यांच्याशी झाला. जोतिबा हे आधुनिक सुधारणावादी विचारांचे होते. स्वातंत्र्य , समता , बंधुता यांचे पुरस्कर्ते होते. मुलामुलींना शिक्षण घेण्याचा समान अधिकार आहे हे त्यांचे ठाम मत होते. सामाजिक भेदभाव, विषमता संपलीच पाहिजे असे ते विचाराने आणि कृतीने दाखवून देत.  अशा जोतिबांच्या पत्नी तरी कशा मागे राहतील. त्यांचेही आचार विचार पतीसारखेच होते.
    जोतिबांनी कर्मठ विचारसरणीच्या वर्चस्व असलेल्या त्या वेळच्या पुण्यात १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडली. हळूहळू त्यांनी इतर ठिकाणीही मुली, मुले आणि स्त्रिया यांच्यासाठी शाहा उघडल्या.
    मुलींच्या शाळेत शिकवायला शिक्षक मिळत नसत. म्हणून जोतिबांनी सावित्रीबाईंना सर्व प्रकारचे शिक्षण दिले. मुलींच्या शाळेत त्या शिकवू लागल्या. त्या वेळी स्त्रियांना घराबाहेर पडण्यासही बंदी होती.मग शाळेत जाऊन शिकविणे तर शक्यच नव्हते. सावित्रीबाईंनी स्त्रियांना कलंक लावला, धर्मबाह्य वर्तन केले, असे म्हणत कर्मठ विचारांच्या लोकांनी त्यांचा मानसिक, शारीरिक छळ करायला सुरुवात केली.
    सावित्रीबाई शाळेत जाताना आणि घराकडे परत येताना दुष्ट विचारांचे लोक त्यांना अपमानकारक शब्दांनी टोचू लागले. त्यांचा रस्ता अडवू लागले. काहींनी तर त्यांच्या अंगावर दगड गोटे मारायलाही कमी केले नाही. परंतु सावित्रीबाईंनी आपले समाजसेवेचे ध्येय सोडले नाही. छळ, अपमान सोसुन त्यांनी स्त्रि शिक्षणाचे अवघड कार्य पार पाडले.
    जोतिबांनी सुरु केलेल्या दुष्काळग्रस्त मुलांच्या आश्रमात सावित्रीबाई रात्रंदिवस राबून लहान मुलांचे संगोपन आणि शुश्रुषा करायच्या. शिक्षकाचे काम करीत असल्या तरीही शाळा चालविण्यासाठी त्या रात्री चटया विणून त्याच्या विक्रीतून खर्चाला हातभार लावायच्या. जोतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केल्यावर त्यात दाखल झालेल्या अनाथ मुलांच्या त्या माता झाल्या. त्याही मुलांचे संगोपण आणि देखभाल त्या करु लागल्या. गरीब आणि दलित बांधवांच्या मुलामुलींना कधी अंगावर कपडे नसत, तर कधी खाण्यासाठीही काही नसे, अशा वेळी सावित्रीबाई मायेच्या ममतेने त्यांना काय हवे नको ते पाहत असत.
    अनेक वर्षे सावित्रीबाईंनी पतीच्या कार्यात भाग घेऊन सामाजिक सेवेला वाहून घेतले. त्यांना स्वत:ला मूलबाळ नव्हते. आपली सारी माया ममता त्यांनी या मुलांवर उधळली. छळ, अपमान आणि अपार कष्ट सोसून त्यांनी आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत अखंड समाजसेवेचे महान कार्य पार पाडले.