Pages




Thursday 4 July 2013

थोर समाजसेवक - आचार्य विनोबा भावे


                           


आपल्या आचारांतून, विचारांतून माणुसकीची, त्यागाची शिकवण देणारे आचार्य विनोबा भावे हे एक थोर मानवतावादी पुरुष होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, हा विनोबांचा गुणविशेष होता.
आयुष्यभर ब्रम्हचारी राहून लोकांची सेवा करण्याचे व्रत त्यांनी लहान वयातच स्विकारले होते. आयुष्यभर लोकांना माणुसकीची, त्यागाची शिकवण देणारे आणि स्वत: ते तत्व पाळणारे विनोबा त्यागाचे प्रतिक होते.
    विनोबांचा जन्म रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी इ. स. १८९५ मध्ये झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते गांधीजींचे शिष्य बनले. जन्मभर ब्रम्हचारी राहून गरीब जनतेची सेवा करायची, स्वत:साठी जगायचे नाही, तर आपले उभे आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी खर्च करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले होते.
    त्यांनी सर्वसंगपरित्याग केला होता. गुडघ्यापर्यंत धोतरवजा पंचा आणि खांद्यावर छोटा पंचा हा त्यांचा वेश होता. अगदी साधे आणि थोडे जेवण असा त्यांचा आहार होता. आश्रम हेच त्यांचे घर होते.
    स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन त्यांनी तुरुंगवासही भोगला. तुरुंगात असताना त्यांनी आपल्या प्रवचनातून मानवतेची शिकवण दिली. ते चरख्यावर सूत कातायचे. माणसा माणसामध्ये भेदभाव करु नक. आपण सारे एकाच परमेश्वराची लेकरे आहोत असे ते सांगत असत. समाधानी वृत्ती माणसाला दु:खापासून दूर ठेवते. गरज नसताना साठा केला तर गरजू लोकांवर अन्याय होतेा.आपण इतरांचाही विचार केला पाहिजे.दुसऱ्याला देण्यातच खरा आनंद असतो. अशी शिकवण ते देत असत.
    गांधीजींच्या प्रेरणेने विनोबांनी वर्धा येथे पवनार आश्रम सुरु केला. आपल्या देशातील लोकांची हलाखीची स्थिती विनोबांनी पाहिली. लोकांना खायला पोटभर अन्न मिळत नव्हते. हाताला काम नव्हते. म्हणून विनोबांनी मोठ्या जमीनदारांना विनंती केली आपल्याकडची थोडी जमीन दान करा. असा प्रचार ते करु लागले. विनोबांच्या विनंतीवरुन अनेक मोठ्या श्रीमंत जमीनदारांनी विनोबांना जमीन दिली. विनोबा ही जमीन त्याच गावातील गरीब, भूमिहीन मजूरांना वाटून टाकायचे. गरीब लोक त्या जमिनीत कष्ट करुन पोट भरु लागले.
    अशा रीतीने विनोबांनी भूदान यात्रा सुरु केली. अनेक गावात ते जात. जमीनदारांकडून मिळालेली जमीन भूमिहिनांना वाटून ते पुढे जायचे. कष्टकरी, गरीब लोकांना अशा रीतीने विनोबा जमीन मिळवून देऊ लागले. पदयात्रा करीत ते गावागावात फिरत होते. आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार ठिकाणी फिरुन विनोबांनी हजारो लोकांना मिळालेल्या जमिनीचे वाटप केले. गरीबांच्या कल्याणासाठी त्यांनी सर्वांचा उद्धार करणारी सर्वोदय योजना सुरु केली.
    सर्वोदय योजनेव्दारे गरीबांना प्रगतीचा, प्रकाशाचा, सत्याचा, मार्ग दाखवून त्यांचे कल्याण साधणारे विनोबा चंबळच्या खोऱ्यात आले. तेथील भयंकर दरोडेखोरांनी हजारो लोकांचे जीवन धोक्यात आणले होते. अशा दरोडेखोरांचे प्रबोधनाव्दारे मतपरीवर्तन करुन विनोबांनी त्यांना माणसात आणले.
    स्वच्छतेचे महत्व विनोबांना माहित होते. ते स्वत:ही शौचकूपे साफ करायचे काम करायचे. स्वच्छता हाचे परमेश्वर असे ते सांगायचे. सर्वांचा उद्धार ही शिकवण देणारे आचार्य विनोबा भावे यांनी मानवतेची शिकवण देत १९८२ मध्ये देहत्याग केला.

No comments:

Post a Comment